वर्धा : शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर समिती गठित करून सावकारग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेत प्रकरणे सादर करण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील हजारावर शेतकऱ्यांना मिळणार असून तब्बल दीड कोटी रुपयांवर कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी हंगामाच्या तोंडावर कर्ज काढावे लागते. बॅँकांकडून घेतलेल्या पीक कर्जातून गरज न भागल्यास आणि थकबाकीदार राहिल्यास घरातील सोने, चांदीचा ऐवज घेऊन शेतकरी सावकाराचे दार ठोठावतात. दरवर्षी अनेक शेतकरी सावकारांकडून कर्जाची उचल करतात. बरेचदा शेतीतील उत्पन्न जेमतेम असल्यास सावकाराकडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिनेही सोडविता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर पार पडलेल्या बैठकीत १ हजार ६५ प्रकरणांना मंजुरी देत १ कोटी ५६ लाख ५ हजार ३४७ रुपयांची कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी पोलीस गृहअधीक्षक किल्लेकर, जिल्हा उपनिबंधक तलमले, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांच्यासह सहायक निबंधक सहकारी संस्था आदी उपस्थित होते. याबाबतची यादी संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)
हजारावर शेतकऱ्यांना दीड कोटींची कर्जमाफी
By admin | Published: November 13, 2015 12:39 AM