मुंबई : आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ८ टक्के इतकीच आहे. ही संख्या वाढून २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट्य आज परिषदेत निश्चित करण्यात आल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आयआयटी पवई येथे शुक्रवारी देशातील सर्व आयआयटीच्या कौन्सिलची ५१ वी परिषद पार पडली. या परिषदेत आयआयटीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा उपक्रमांची चर्चा करण्यात आली. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक असली तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी मुलींच्या जागा वाढवण्यात येणार आहे. तसेच, नीती आयोगाप्रमाणेच आयआयटीची कार्यपद्धती सुद्धा तीन भागात विभागली जाईल. याप्रमाणे कार्ययोजना ३ वर्षे, धोरण योजना ७ वर्षे आणि दीर्घकालीन योजना १५ वर्षांची असेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. देशातील हुशार, कल्पक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेद्वारे निवड करुन त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. पण, गेल्या काही वर्षांत आयआयटीमध्ये अभ्यास करत असताना वाढणाऱ्या ताणावर नियंत्रण न मिळवता आल्याने विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. घरापासून लांब असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास, आयआयटीच्या वातावरणाचा ताण येऊ नये म्हणून खास विद्यार्थ्यांसाठी ‘वेलनेस सेंटर’ची स्थापना करण्यात येणार आहे. सेंटरची स्थापना करताना विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विशेष विचार केला जाणार आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीची ओळख करुन देण्याच्या पद्धतीतही आयआयटी कॅम्पस काय आहे हे त्यांना पहिल्याच दिवशी समजावून सांगितले जाणार असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मुलींसाठी आयआयटीमध्ये जागा वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 2:58 AM