मुंबई : राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात. पण त्या वेळी पदव्युत्तर (एमडी, एमएस) शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या १ हजार ६०० इतकीच आहे. राज्य सरकारने मनावर घेतल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढू शकतात. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) पत्र लिहिले आहे.८ आॅगस्ट २०१५ रोजी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागेसाठी ‘एमसीआय’ने मान्यता दिली असेल, तर ते महाविद्यालय केंद्र सरकारच्या परवानगीने जागा वाढवू शकते. त्या निकालानुसार राज्यातील शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणे सहज शक्य आहे. या जागा वाढल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याचे मत सेंट्रल मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी व्यक्त केले. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तर त्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. पण, सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवल्यास सहज जागा वाढवणे शक्य आहे. कारण, जागा वाढवण्यासाठी ‘एमसीआय’च्या पुन्हा पाहणीची आवश्यकता नसते, असे मार्डने पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
‘वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवाव्यात’
By admin | Published: May 19, 2016 5:09 AM