तिकीट दरवाढ : ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून होणार लागूनागपूर : रेल्वेच्या दरवाढीवर सर्वस्तरातून टीका होत असताना एसटी महामंडळानेही ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता एसटीच्या प्रवाशांचेही ‘बुरे दिन’ आले आहेत.डिझेलची दरवाढ झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ३१ जुलैपासून आपल्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार साधारण सेवेसाठी ६.२० रुपयाऐवजी प्रति टप्याला ६.२५ रुपये, रातराणी बसेससाठी प्रतिटप्पा ७.३५ ऐवजी ७.४० आणि निमआराम गाड्यांसाठी प्रति टप्पा ८.४५ ऐवजी ८.५५ रुपये प्रवाशांना अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळ तिकिटाची दरवाढ करताना प्रति किलोमीटर नव्हे तर टप्प्याने दरवाढ करते. महामंडळाचा ६ किलोमीटरचा एक टप्पा असतो. त्यामुळे आता ३१ जुलैपासून एसटी महामंडळाच्या प्रवाशांना वाढीव दरानुसार प्रवास करण्याची पाळी आली आहे. मागील महिन्यात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर या दरवाढीचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता. आता महामंडळाच्या प्रवाशांनाही तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागणार असल्यामुळे त्यांचेही ‘बुरे दिन’ आले आहेत.(प्रतिनिधी)
एसटीला महागाईची झळ
By admin | Published: July 28, 2014 1:35 AM