EVMवर काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही? पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी मांडली रोखठोक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 08:35 IST2024-12-18T08:26:16+5:302024-12-18T08:35:32+5:30
या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल रमेश चेन्नीथला हे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविणार आहेत.

EVMवर काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही? पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी मांडली रोखठोक भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व खापर ईव्हीएम मशीनवर फोडल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधातील भूमिका तीव्रपणे मांडली जात असतानाच काँग्रेस पक्षातच याबाबत एकवाक्यता नसल्याचे सांगितले जाते आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमसंदर्भात परस्परविरोधी मते मांडली आहेत.
विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी कुणाला संधी द्यावी, प्रदेशाध्यक्ष बदलावा की कायम ठेवावा, याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसचे विधानसभा व विधान परिषदेतील आमदार तसेच पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ७च्या सुमारास रमेश चेन्नीथला दाखल झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, आरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर, भाई जगताप, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही
रमेश चेन्नीथला यांनी सर्वच पराभूत उमेदवारांना ईव्हीएमचा दोष वाटतो का, अशी विचारणा केली. त्यावर बहुसंख्य उमेदवारांनी बूथची आकडेवारी सांगत ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काही उमेदवारांनी ईव्हीएमवर नारळ फोडणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही, अशी रोखठोक भूमिकाही मांडली. विधानसभेतील १६ पैकी १५ आमदार तर परिषदेतील ८ पैकी ७ आमदार आणि पराभूत ४७ उमेदवारांनीही रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभेच्या आमदारांना गटनेते पदाबाबत नाव सुचविण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. आमदारांनी व्यक्त केलेली मते चेन्नीथला यांनी नोंदवून घेतली. पराभूत उमेदवारांनाही प्रदेशाध्यक्षाबाबत विचारणा करण्यात आली. या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल चेन्नीथला हे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविणार आहेत. यानंतर गटनेतेपदाचा निर्णय दिल्लीतून कळविला जाईल, तर प्रदेशाध्यक्षांबाबतचा निर्णय घ्यायला काही कालावधी लागेल, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.