शांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव उत्साहातनागपूर : मातृहृदयाने स्पर्श केल्यास समोरच्या व्यक्तीत बदल घडून येतो. जननीमध्ये शक्ती आहे. त्यामुळे तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती जननीच करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आज येथे केले.सेवासदन समितीच्या परिसरात आयोजित राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. अनुराधा रिधोरकर, राष्ट्रसेविका समितीच्या विदर्भ कार्यवाहिका सुलभा गौड, नागपूर महानगर कार्यवाहिका करुणा साठे, अखिल भारतीय सह शारीरिक प्रमुख मनिषा संत, पूर्व प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे उपस्थित होत्या. शांताक्का म्हणाल्या, डॉक्टर जसे प्रेमाने आजारी व्यक्तीला स्पर्श करून त्याचा अर्धा आजार दूर करतात. त्याच प्रमाणे जननी सुद्धा राष्ट्राची निमिर्ती आपल्या मातृत्वभावाने करू शकते. त्यासाठी धैर्य ठेऊन अन्यायाला विरोध करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनुराधा रिधोरकर म्हणाल्या, आजही अनेक निर्भया बळी जात असून स्त्री सबला झालेली नाही. राष्ट्रसेविका समितीचे आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य महान आहे. हातात हात घालून पुढे जाणे हेच खरे स्त्रीत्व आहे. कुटुंबात मुलांचे ऐकून घेणे गरजेचे असून घरातील आई शिस्तप्रिय असायला हवी. मुलांनी जंक फूड टाळून आठवड्यातून किमान तीन दिवस पायी चालण्याची गरज आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी महिलांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी विविध आत्मरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझीम, दंडयोग, योग चापाचे प्रात्यक्षिक, ध्वज संचलन, सांघिक योग, सांघिक गीत सादर केले. संचालन डॉ. लीना गहाने यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)
जननीच करू शकते तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती
By admin | Published: September 29, 2014 1:05 AM