ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - कोल्हापूरमधील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ आता हेरिटेजच राहणार हे आता निश्चित झाले आहे. जयप्रभा स्टुडिओवरून राज्य सरकारविरोधात दाखल केलेली याचिका लता मंगेशकर यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर जयप्रभा स्टुडिओचा वाद आता संपुष्टात आला आहे. जयप्रभा स्टुडिओची व्यावसायिक कारणांसाठी विक्री करण्याचे स्टुडिओच्या सध्याच्या मालकीण पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी २०१२ मध्ये ठरवले होते. मात्र अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने याला विरोध केला. पुढे चित्रपट महामंडळासह व्यावसायिक व कोल्हापूरकरांनीही मोर्चा, आंदोलनांद्वारे साडेतीन एकरांतील हा स्टुडिओ वाचविण्यासाठी प्रयत्न केले होते. पुढे हा वाद न्यायालयात गेला होता. अखेर आज लता मंगेशकर यांनी याचिका मागे घेतल्याने हा वाद संपुष्टात आला.
अधिक वाचा
(जयप्रभा स्टुडिओला प्रतीक्षा चित्रीकरणाची)जयप्रभा स्टुडिओशी संबंधित अनेकांच्या आठवणी निगडित आहेत. त्यामध्ये भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, दामले-फत्तेलाल, अनंत माने या दिग्गजांसह अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे, अरुण सरनाईक, आशा काळे, बेबी शकुंतला, रमेश देव, सीमा देव, राजशेखर ते अलीकडचे भास्कर जाधव, यशवंत भालकर अशा कितीतरी असामींचा समावेश आहे. त्यांची कारकीर्द याच स्टुडिओत घडली आहे.
दरम्यान, २०१५ साली लता मंगेशकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने जयप्रभा स्टुडियो हेरिटेज असल्याचा निकाल दिला होता.