जमीर काझी, मुंबई२६/११च्या हल्ल्यात पोलिसांनी बजाविलेल्या शौर्याचे नेहमी गोडवे गाणाऱ्या राज्य सरकारला या घटनेत जखमी झालेल्या १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तब्बल ६ वर्षे आणि ११ महिन्यांनी मायेचा पाझर फुटला आहे. अपुऱ्या शस्त्रांनिशी जिवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी लढताना गंभीर जखमी झाल्याने औषधोपचारासाठी व्यतित झालेला त्यांच्या कालावधीची रजा अखेर विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश गृह विभागाकडून नुकतेच बजावण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत प्रवेश केला होता. त्यांचा प्रतिकार करताना मुंबई पोलीस दलातील १८ अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पूर्ववत होऊन ड्युटीवर पुन्हा हजर होण्यासाठी अनेकांना कित्येक महिन्यांचा कालावधी लागला. प्रशासनाने त्यांच्या अनुपस्थितीचे दिवस अर्जित रजेमधून कपात केले होते. उपचारासाठी व्यतित केलेला कालावधी विशेष रजा म्हणून गृहीत धरावा, अर्जित रजेमधून तो कालावधी वगळू नये, अशी मागणी या जखमींकडून वारंवार होत होती. मुंबईचे तत्कालीन आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी त्याबाबत ३ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला आता दोन वर्षांचा अवधी होत आला असताना विशेष रजेची मागणी मंजूर केली आहे. २६/११ ही सामान्य घटना नाही, त्यामुळे या घटनेत जखमी झालेल्या १८ अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा गैरहजर कालावधी हा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१मधील नियम ७७ (१) बीनुसार विशेष रजा म्हणून समजण्यात येईल, असे त्याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे. (त्या वेळचे पद व कंसात त्यांच्या अनुपस्थितीचे दिवस)हवालदार मधुकर झोले (६२), कॉन्स्टेबल बाळू मोरे (१०७), कॉन्स्टेबल शंकर पवार (३५), नाईक अरुण जाधव (१८०), कॉन्स्टेबल शंकर व्हंडे (३३८), कॉन्स्टेबल अमित खेतले (६६), कॉन्स्टेबल सचिन टिळेकर (८८), सहायक निरीक्षक विजय पोवार (७२), हवालदार मोहन शिंदे (१५४), कॉन्स्टेबल विनायक दंगव्हाळ (१५), निरीक्षक दीपक ढोले (९७), निरीक्षक नितीन काकडे (६९), नाईक निवृत्ती गव्हाणे (१८३), नाईक अशोक पवार (१२५), कॉन्स्टेबल सौदागर शिंदे (३०), नाईक प्रवीण सावंत (२८७), सहायक निरीक्षक संजय गोविलकर (४), सहायक निरीक्षक विजय शिंदे (१८१)
दहशतवादी हल्ल्यातील जखमी पोलिसांना न्याय
By admin | Published: October 14, 2015 3:57 AM