मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे सध्या राज्यात हिंदू-मुस्लिम वाद चर्चेत आहे. अनेकदा निवडणुकीवेळी विविध पक्ष मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा उपस्थित करत असतात. आता याच मुद्द्यावर अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान(Kamal R Khan) याचे ट्विट चर्चेत आले आहे. "मुस्लिमांनी शिवसेनेला(Shivsena) मतदान करावं, असे आवाहन त्याने ट्विटमधून केले आहे."
केआरके सोशल मीडियावर सक्रिय असून, तो त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. यावेळी केआरकेने केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्याने महाराष्ट्रातील मुस्लिमांना आवाहन करत शिवसेनेला मतदान करायला सांगितलं आहे. केआरके आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, "महाराष्ट्रातील मुस्लिमांनी आभारी असलं पाहिजे की त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्यामुळेच ते सन्मानाने जीवन जगत आहेत."
"राज्यातील सर्व मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेलाच मतं द्यायला हवीत. भाजपाचे एजेंट असलेल्या ओवेसी आणि आझमी यांना मतं देऊ नका," असं ट्वीट केआरकेने केले आहे. दरम्यान, रामनवमीपासून गुजरात,पश्चिम बंगाल आणि झारखंडसह अनेक राज्यात सुरू असलेल्या हिंसक प्रकरणांची देशभरात चर्चा सुरू आहे. सुदैवाने महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर केआरकेचे ट्विट चर्चेत आले आहे.होती.