ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी व आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. अधिकृत व्हिसावर भारतात आलेल्या विदेशी पाहुण्यांना संरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचंही फडणवीस म्हणाले. अर्थात, या कार्यक्रमामध्ये भारतविरोधी प्रपोगंडा राबवल्याचे आढळले तर ते खपवून घेतलं जाणार नाही, आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
कसुरी यांच्या नायदर हॉ नॉर डव्ह या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून कसुरी यांना तसंच या कार्यक्रमाला चोख सुरक्षा पुरवण्याचे फडणवीसांनी आश्वासन दिले आहे.
पाकिस्तानी गझलगायक गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करायला लावल्यानंतर शिवसेनेने कसुरी यांचा कार्यक्रम होता कामा नये अशी भूमिका घेतली. काही अज्ञात व्यक्तिंनी आयोजक असलेल्या कुलकर्णींना शाईची आंघोळ घातल्यानंतर शिवसेनेने या कृत्याचे समर्थन करत शिवसैनिकांनीच हे केल्याला पुष्टी मिळाली. संध्याकाळी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमालाही विरोध असल्यामुळे शिवसैनिक तो बंद पाडण्याचा प्रयत्न करतिल अशी शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर वरळी नेहरू सेंटर येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.