ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २४ - कोकण रेल्वेवरील वीर आणि करंजाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी सकाळपासून ठप्प पडली आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत असून अनेक गाड्या् रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास वीर आणि करंजाडी स्टेशनदरम्यान मालगाडीचे सात डबे घसरले.या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र मालगाडीचे डबे दूर करण्यासाठी आणखी काही तास लागणार असल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी दिवसभर बंद राहणार असल्याचे समजते. कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी यावर अधिकृत माहिती दिली नसली तरी डबे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. या अपघातामुळे एसी डबल डेकर प्रिमियम एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी पॅसेंजर पनवेल स्टेशनवर अडकली आहे. मंगला एक्सप्रेस रत्नागिरी, कोईम्बतूर - बिकानेर एक्सप्रेस कणकवली, केरळ संपर्कक्रांती एक्सप्रेस आडवली आणि नेत्रावती - एर्नाकुलम एक्सप्रेस सिंधुदुर्ग स्टेशनवर थांबवण्यात आली आहे.