मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष आणि संघटनांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. दुपारी दीड वाजता भायखळ्यातील राणीबाग मैदानातून निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय सामील झाला होता. सरकारविरोधात निदर्शने करत जे.जे. उड्डाणपुलावरून निघालेल्या भव्य मोर्चामुळे लाल जनसागर उसळल्याचे चित्र निर्माण झाले होते.मोर्चामध्ये सामील प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडी पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी होती. ‘‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा’’, ‘‘नथुराम प्रवृत्ती हाणून पाडा’’ अशा घोषणा देत कार्यकर्ते आक्रोश व्यक्त करत होते. आम्ही पानसरे म्हणत प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. दुपारी साडेतीन वाजता आझाद मैदानावर धडकलेल्या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.सभेला संबोधित करताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अतिरेकी झालेल्या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. (प्रतिनिधी)
मुंबईत उसळला ‘लाल’ जनसागर
By admin | Published: March 12, 2015 5:10 AM