मुंबई : मरीन ड्राईव्हवर लावलेले एलईडी दिवे तत्काळ काढून क्वीन्स नेकलेसला पुन्हा लकाकी द्यावी, अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडे शिवसेनेने आज केली़ त्याचवेळी या दिव्यांमुळे विजेची बचत होत असल्याचा होरा भाजपाने लावला आहे़ उभय पक्षांमधील या भांडणात बेस्ट प्रशासनाची कोंडी झाली आहे़ परंतु दिवे काढण्याचे अधिकार बेस्टला नाही, असे स्पष्ट करत महाव्यवस्थापकांनी यातून आपली सुटका करुन घेतली़मुंबईतील पिवळे दिवे बदलून एलईडी बसविण्याचा उपक्रम भाजप सरकारने घेतला आहे़ पालिकेच्या तिजोरीतूनच यासाठी खर्च होणार आहे़ भाजपने या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय लाटत शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली़ परिणामी उभय पक्षांमध्ये वाद पेटला आहे़ त्यामुळे मरीन ड्राईव्हवर बसविण्यात आलेले दिवे काढण्याची सूचना शिवसेनेचे सुहास सामंत यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली़ बेस्ट समितीला विश्वासात न घेता हे दिवे बसवून समितीचा एकप्रकारे अवमानच करण्यात आला आहे़ आर्थिक संकटात असलेल्या बेस्टवर केंद्र सरकार अन्याय करीत असल्याच्या निषेधार्थ समाजवादीचे याकूब मेमन यांनी सभात्याग केला़ मनसे आणि काँग्रेस पक्षानेही एलईडी दिव्यांचा विरोध केला़ (प्रतिनिधी)
एलईडी दिवे ‘पेटलेले’
By admin | Published: March 12, 2015 5:12 AM