गडचिरोली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसला विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र भाजपाची ‘अॅलर्जी’ नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे़ विदर्भात भाजपाशी जिल्हा परिषदांमध्ये असलेली युती आगामी विधानसभा निवडणूक काळातही कायम राहणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ पवार म्हणाले, काँग्रेसनेही कोल्हापूर, उस्मानाबादमध्ये इतर पक्षांशी युती केली आहे. दोन्ही काँग्रेसने मिळून अशा युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीतही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत आघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील युती तुटली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतही स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपाशी असलेली युती अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. दरम्यान, गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्थानिक स्तरावरील या आघाड्या तोडणे राष्ट्रवादीला शक्य नाही. दोनतृतीयांश बहुमत लागते, असे सांगत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावरच यावर विचार करता येईल, असे ते म्हणाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी राहणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.राज्यात निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पक्ष विविध आंदोलन तापविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत धनगर व आदिवासी यांच्यामध्येही अशाच प्रकारचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)
स्थानिक पातळीवर भाजपासोबतच!
By admin | Published: August 13, 2014 2:59 AM