"काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू” नाना पटोलेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:47 IST2024-12-05T18:43:24+5:302024-12-05T18:47:37+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

"काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू” नाना पटोलेंचा इशारा
मुंबई - निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून, या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन्यासाठी कसरत करावी लागली. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्त्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करुन मंत्रीपदांची भिक मागण्याची वेळ या दोघांवर आली. मोदी-शाह यांच्या मेहरबानीवर शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. एकनाथ शिंदे यांची तर भाजपाला आता काहीच गरज नाही त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजपा व मोदी शाह यांनी जागा दाखवून दिली आहे. भाजपाने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपवले आहेत, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपाचे सरकार स्थापन झाले असून निवडणूक त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपाची विज बिल माफ, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये, २.५ रिक्त सरकारी पदांची भरती याची तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.