मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सुरू झालेला सत्ता संघर्ष आता नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे. यानंतर आता भाजपानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला खोचक टोला लगावला आहे.
"काय ती झाडी काय तो डोंगार? एकदम ओके सरकार" म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात आता रामराज्य आले. भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार. काय ती झाडी काय तो डोंगार? एकदम ओके सरकार" असं मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"जय महाराष्ट्र! एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जनता शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना कधीच विसरू शकणार नाही. कोरोनासारखी संकट, चक्रीवादळ पेलणारे आपण, आज इतकेच सांगतो महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील. आज महाराष्ट्राने एक उत्तम व सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. याची नोंद तरुणांच्या हृदय पटलावर कायम राहील महाराष्ट्राच्या जनमनात कायमचे स्थान मिळवणाऱ्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यास मनापासून दंडवत" असंही अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. आता राज्यपाल विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करू शकतात. भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. फडणवीस आणि शिंदे गटात मंत्रिपदांचा फॉर्म्युला कसा असेल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.