महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 20:28 IST2019-10-24T20:27:38+5:302019-10-24T20:28:15+5:30
Maharashtra Election Result 2019: भाजपाच्या जागांमध्ये घट; विदर्भात मोठा फटका

महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला
मुंबई: राज्यात महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मात्र भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. अब की बार 200 पार अशी घोषणा महायुतीनं केली होती. मात्र प्रत्यक्षात महायुती जवळपास 160 जागा जिंकताना दिसत आहेत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली होती. मात्र विरोधकांनी चांगली लढत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढणाऱ्या भाजपाला दणका दिला.
विजयी उमेदवार आणि आघाडी यांचा विचार करता भाजपाच्या पारड्यात सध्या 104 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला 122 जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपाला 18 जागांवर फटका बसला. योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपानं विदर्भात नेमक्या अठराच जागा गमावल्या आहेत. विदर्भातल्या एकूण 63 पैकी तब्बल 45 जागांवर भाजपानं 2014 मध्ये विजय मिळवला होता. मात्र यंदा विदर्भात भाजपाला 27 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड समजल्या जाणाऱ्या विदर्भात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात 10, तर राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली होती. मात्र यंदा काँग्रेस, राष्ट्रवादीनं विदर्भात भाजपाला धक्का दिला. या निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भात 17 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादीनं 6 जागा मिळवल्या. यंदा विदर्भात इतरांनी 8 जागांवर विजय मिळवला.
भाजपाला सत्ता दिल्यास वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निकाली लागेल, अशी जनभावना होती. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत विदर्भवासीयांनी भाजपाला भरभरुन मतदान केलं होतं. मात्र गेल्या पाच वर्षांत वेगळ्या विदर्भाच्या हालचाली झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्रीपदाची साडेचार वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं फडणवीसांनी आपल्याला खासगीत सांगितलं होतं, असं पवार यांनी म्हटलं होतं. मात्र ही बाब फडणवीस यांनी फेटाळून लावली. त्याचा फटका भाजपाला विदर्भात बसला का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.