नागपूर : ‘एक्झिट पोल्स’ने भाजपा व रालोआ परत सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे नेते सावध असून निकालानंतरच्या संभाव्य परिस्थितीवर संघभूमीत मंथन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह व्ही. भागय्या, पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत बराच वेळ चर्चा झाली.
एरवी संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ‘व्हीव्हीआयपी’ नेते संघ मुख्यालयात जातात. मात्र सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अचानक भय्याजी जोशी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहोचले. कैलास विजयवर्गीय व व्ही.भागय्या हेदेखील त्याच सुमारास पोहोचले होते. त्यानंतर सुमारे दोन तास विविध मुद्यांवर सखोल मंथन झाले. प्रामुख्याने ‘एक्झिट पोल्स’मधील अंदाज, बंगाल व उत्तरप्रदेशमधील स्थिती व निकालानंतरची संभाव्य पावले यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान विजयवर्गीय यांनी मात्र ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. यात राजकीय विषयांवर नव्हे तर सामाजिक विषयांवर चर्चा झाली. देशाच्या विविध भागात ग्रामविकास, स्वदेशी तसेच अंत्योदय प्रकल्प राबविण्याबाबत ही बैठक होती, असे त्यांनी सांगितले.
भाजपाध्यक्षपदी शहाच हवेतअमित शहा यांचा भाजपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. सातत्याने दोनदा ते या पदावर होते. पुढील अध्यक्षपदाबाबत विजयवर्गीय यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता मी कुठल्याही स्पर्धेत नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपाने प्रभावी कामगिरी केली आहे. भाजपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा तेच हवे. पक्षाने नियमांमध्ये शिथिलता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.