औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, मागील २० वर्षांमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूदच करण्यात आलेली नाही. सरकारने तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन दरवर्षी एक हजार कोटींची तरतूद केल्यास रस्त्यांची अवस्था सुधारू शकेल.एकीकडे शासन ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबवीत आहे. मात्र मराठवाड्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट असून एसटी महामंडळाने तर काही गावांना बस पाठविणेच बंद केले आहे. औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या दिवाळीपासून एक रुपयाही निधी मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद ते पैठण आणि औरंगाबाद ते अजिंठा हे दोन प्रमुख रस्ते चारपदरी करण्यात येत असल्याचे सांगत त्यांचे भूमिपूजनही झाले. मात्र, आजपर्यंत प्रत्यक्षात काहीच काम सुरू झालेले नाही. औरंगाबाद शहरात रस्ते विकास महामंडळातर्फे जालना रोडवर तीन उड्डाणपूल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामात मोंढा नाका येथील साईड रोड ७ मीटरऐवजी ३ मीटरच ठेवण्यात आला आहे. महामंडळाच्या या चुकीमुळे औरंगाबादकरांना त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
मराठवाड्यातील रत्यांची दुरवस्था
By admin | Published: March 12, 2015 1:57 AM