मुंबई : दुष्काळाला कंटाळून राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर सरसावले आहेत. आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी मार्डने योजना आखल्या असून, मुख्यमंत्री दुष्काळ साहाय्यता निधीत साडेचार लाख रुपयांचे निधी दिला आहे.राज्यात वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानाचा आघात सहन न करू शकलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा प्रकारे मानसिक ताणाखालील शेतकऱ्यांना राज्यातील निवासी डॉक्टर आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. मानसशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना मराठवाड्यात जाण्याची संधी मिळावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे पत्र पाठवले आहे. विदर्भातील काही ठिकाणीच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांचा मानसिक तोल ढासळण्यासाठी अनेक कारणे असतात. पण वेळीच त्यांच्या मानसिक तणावाचे निदान झाल्यास शेतकऱ्यांवर उपचार करून त्यांना ताणातून बाहेर काढता येऊ शकते. नांदेड, औरंगाबाद, लातूर, अंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर शिक्षणासाठी मानसशास्त्र विभाग नाही. यामुळे मुंबई, पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी २५ विद्यार्थी बाहेर पडतात. शिक्षण घेणाऱ्या २-३ डॉक्टरांना १५ दिवसांसाठी त्या विभागात पाठवण्याची मागणी केल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.मार्ड संघटना शेतकी कुटुंब दत्तक घेणारराज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील काही रक्कम ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. तर १० दिवसांमध्ये निवासी डॉक्टर जुने कपडे गोळा करणार असून शेतकरी कुटुंबांना देणार आहेत. डॉक्टरांकडे असलेली काही गरजेची औषधेदेखील या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. स्थानिक मार्ड संघटना त्यांच्या विभागातील एक शेतकरी कुटुंब दत्तक घेणार आहे. या कुटुंबाला सर्व मदत मार्डतर्फे केली जाणार आहे. याचबरोबर पुढचे तीन महिने स्थानिक मार्ड या कुटुंबाला ३ हजार रुपयांची मदत करणार असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मार्ड सरसावले
By admin | Published: September 19, 2015 4:16 AM