लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करून बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व १० मंत्र्यांना व विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. आमदारांना मोठ्या प्रमाणात डच्चू मिळणार अशी चर्चा असताना जुन्या शिलेदारांवर विश्वास टाकण्यात आल्याचे पहिल्या यादीवरून दिसते. १३ महिलांनाही संधी देण्यात आली आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये अनेक विद्यमान आमदारांचा तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपने पत्ता कापला होता आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवत धक्कातंत्राचा वापर केला जाईल, अशी चर्चा होती पण आजी-माजी मंत्र्यांसह विधानसभेत सातत्याने भाजपचे प्रतिनिधीत्व करत आलेले अनेक चेहरे यादीत आहेत. भाजपने विद्यमान १७ आमदारांच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.
२९ मंत्री असलेल्या महायुती त्या सरकारमध्ये भाजपचे १० मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविणार या चर्चेला त्यांना भाजपचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा म्हणून समोर करत आधीच पक्षनेतृत्वाकडून उत्तर देण्यात आले होते. त्यांना दक्षिण-पश्चिम नागपुरातून उमेदवारी देत या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.
तीनपेक्षा अधिक वेळा आमदार- २०१४ ते २०१९ मधील फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, मदन येरावार, अशोक उइके, विद्या ठाकूर, विजयकुमार देशमुख यांनाही पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे.
चार आमदाराच्या नातेवाइकांना संधी
- पुणे जिल्ह्यातील चिंचवडचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी विद्यमान आमदार अश्विनी जगपात यांच्याऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा अमोल जावळे, कल्याण पूर्वचे तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या जागी पत्नी सुलभा गायकवाड, श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिले आहे.
कोणत्या विभागातून किती उमेदवार?
विदर्भ २३, उत्तर महाराष्ट्र - १९, मराठवाडा १६, पश्चिम महाराष्ट्र १६, मुंबई १४, ठाणे - ७, पालघर- १, रायगड २, कोकण - १
बावनकुळेंसाठी सावरकरांचा पत्ता कट
■ प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांची विधानसभेची गाडी २०१९ मध्ये हुकली होती. त्यावेळी बरेच मोठे नाट्य घडले. त्यांच्या पत्नीला उमेदवारी अर्ज भरायला सांगितले पण नंतर त्यांनाही नकार देण्यात आला.
■ बावनकुळे यांनी त्यावेळी कोणाच्याही विरोधात प्रतिक्रिया दिली नाही. नंतर ते प्रदेश सरचिटणीस, विधान परिषद आमदार आणि नंतर प्रदेशाध्यक्ष नाले. त्यांना कामठीतून संधी देताना विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना अर्थातच संधी नाकारण्यात आली.