पुणे : उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे. विदर्भात तर सूर्य आग ओकू लागला असून, शुक्रवारी चंद्रपूरात ४४.२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. देशातील सर्वाधिक तापलेल्या १० शहरांपैकी पहिली तीन शहरे महाराष्ट्रातील असल्याची नोंद स्कायमेटने नोंदविली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट आहे. गेल्या चार दिवसांत त्याची तीव्रता थोडी कमी झाल्याने दिलासा मिळाला होता, परंतु शुक्रवारी पुन्हा पारा चांगलाच वाढला. त्यातही सर्वाधिक झळ विदर्भाला बसली. तेथील बहुतांश ठिकाणचे तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान होते. होरपळून टाकणाऱ्या या ऊन्हामुळे उपराजधानी नागपूरसह विदर्भवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही जिवाची काहिली होत आहे. परभणी, नांदेड, बीड यांसह मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, खान्देशात जळगाव, मालेगाव या शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होते. (प्रतिनिधी)>राज्यांतील शहरांतील कमाल तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई ३३.५, रत्नागिरी ३२.१, पुणे ३७.७, अहमदनगर ४१.५, जळगाव ४०, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३३.१, मालेगांव ४२, सांगली ३९.७, सातारा ३८.४, सोलापूर ४०.७, औरंगाबाद ३९.२, परभणी ४१.१, नांदेड ४१.५, अकोला ४२.६, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४३.३, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४३.३, वाशिम ३८.८, वर्धा ४३, यवतमाळ ४०.५.गोवा, कोकण, येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही ऊन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे.
सर्वाधिक तीन हॉट शहरे महाराष्ट्रातील
By admin | Published: April 08, 2017 5:33 AM