मुंबई : पश्चिम प्रकोप (वेस्ट डिस्टर्बन्स)चा प्रभाव म्हणून राज्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच आहे. मागील २० तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तर १३ आणि १४ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मागील दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जास्त मारा होत आहे. मुंबईतही अवकाळी पावसाच्या धारा कोसळल्या असून, त्यानंतर घटलेल्या किमान आणि कमाल तापमानाने पुन्हा उसळी घेतली आहे. परिणामी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा थेट ३५ अंशावर पोहोचला असून, किमान तापमानाचा पाराही २४ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे तापदायक दिवसानंतर रात्रीही मुंबईकरांना काहीशा उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.किमान तापमानाच्या नोंदीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
मुंबई तापू लागलीं
By admin | Published: March 12, 2015 5:04 AM