नागपूर - महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना जलदगतीने प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर कमी झाले असून अवघ्या ६ तासांत शिर्डी गाठणं नागपूरकरांना शक्य झालं आहे.
त्यात आता समृद्धी महामार्गावर लालपरी धावणार आहे. एसटी महामंडळाकडून आजपासून नागपूर-शिर्डी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper) आहेत. सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे.
किती असणार प्रवास भाडे?या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ती १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच, ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे.
औरंगाबादसाठी बस सुस्साट धावणारशिर्डीसोबतच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात आली आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे.
'असा' असेल तिकीट दरसदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे, तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.