Congress Nana Patole News: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. बीड, परभणी प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरले आहे. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागू शकतात, असा कयास आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. दुसरीकडे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएमविरोधातील लढा सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय मतदान दिनी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही. राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली असून मतदान मतपत्रिकेवरच घ्यावे, अशी मागणी जनतेतूनच येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे, निवडणूका या निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पाडल्या पाहिजेत, यासाठी काँग्रेस राष्ट्रीय मतदार दिनी दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.
भाजपा-निवडणूक आयोगाची अभद्र युती लोकशाहीसाठी कलंक
भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, उद्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार खासदार, माजी आमदार खासदार, जिल्हा पदाधिकारी, विभाग व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.