मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झालीय. शेतकरी आजपासून 10 दिवस संपावर गेले आहेत. राष्ट्रीय किसान महासंघानं केलेल्या घोषणेनुसार राज्यातील शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या काळात शेतकऱ्यांकडून कोणताही माल विक्रीस आणणार नाहीत. संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी विविध भागांमध्ये शेतमाल वाहून नेणाऱ्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली. खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकरचे नळ सोडून दूध रस्त्यावर ओतलं. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. आज दिवसभर राज्यातील विविध भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. कोल्हापूरमध्ये सकाळी 11 वाजता किसान महासभेचा मोर्चा निघणार आहे.
देशातील शेतकरी आजपासून 10 दिवस संपावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 10:42 IST