अहमदनगर : राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया नोंदवत पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. दरम्यान, १८ रोजी भाजपा प्रवेशाच्या वृत्ताचा इन्कार करतानाच समर्थक कार्यकर्त्यांनी निर्णय दिला तर राष्ट्रवादीत राहून घरी बसू, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. आज उशिरा सायंकाळी पाचपुते यांचा भाजपा प्रवेश १८ रोजी होईल, अशी वार्ता पसरली. याबाबत संपर्क केला असता आ.पाचपुते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र पक्षात आपण एकटे पडलो आहोत, ही भावना त्यांना लपवता आली नाही. ते म्हणाले, आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटलो. आमचे नेते अजित पवार यांच्याकडे गेलो. पण त्यांनी समजूनच घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले, या तक्रारी असतील तर त्याचा खुलासा करण्याची संधी मिळाली पाहिजे होती. मात्र पक्षात ऐकूनच घेतले जात नाही. याप्रकारे संवाद आणि विश्वास संपला तर पक्ष संघटना पुढे कशी वाढणार, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, आपण बोलतोय हे सर्वांच्याच मनात आहे. पण बोलण्याची हिंमत होत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शरद पवार आमचे नेते होते, आजही आहेत, असेही ते म्हणाले. मनातील खंंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मांडली होती, असा नवा खुलासाही आ.पाचपुते यांनी आज केला. मात्र त्यानंतरही पक्षाकडून दखल घेण्यात आलेली नाही, याची कबुलीही त्यांनी दिली. यामुळेच समर्थक कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडण्याचा दबाव वाढला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, भाजपाकडून संपर्क झाल्याचा दुजोरा त्यांनी दिला. मात्र पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगीतले. १५ आॅगस्ट रोजी श्रीगोंद्यात समर्थकांचा मेळावा होईल. या मेळाव्यात होणारा निर्णय आपल्याला मान्य राहील. पक्षातच राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी दिला, तरी त्याचा आदर राखत आपण घरी बसू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीतील संवाद, विश्वास संपला - बबनराव पाचपुते
By admin | Published: August 14, 2014 1:25 AM