Sharad Pawar PC News: मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले. यानंतर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, आता शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांना इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे भवितव्य तसेच ठाकरे गटाची स्वबळावर लढण्याची भूमिका यांसदर्भात प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तरे देताना शरद पवार यांनी भूमिका मांडताना सूचक शब्दांत याबाबतचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्यात इंडिया आघाडीचा संबंध नाही. पण राज्यातील महाविकास आघाडीचे शिबिराबाबत येत्या आठ ते दहा दिवसात काँग्रेस, शिवसेना आणि आमचे नेते सहकारी एकत्र बसून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाच्या भूमिकेवर शरद पवारांचे सूचक संकेत; स्पष्ट शब्दांत म्हणाले...
इंडिया आघाडीत आम्ही सर्व एकत्र बसलो तेव्हा आमच्याकडे जेव्हा निवडणुका होत्या. त्यात एकत्र येण्याचा विचार होता. राज्यातील आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावं अशी चर्चा कधीही झाली नाही. इंडिया आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झालीच नव्हती. राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा या आघाडीत होत होत्या. महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या भूमिकेबाबत खुलासा केला आहे का, ते माहिती नाही. परंतु, एक स्वच्छ सांगतो की, आता बारामती आणि इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तिथे आम्ही आघाडीचा विचार केला नाही. करणार नाही. असे असले तरी आता येत्या आठ ते दहा दिवसांत आम्ही एक बैठक घेणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बाहेर आहेत, ते परत आले की, संघटनात्मक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये एकत्रित काम करावे, अशी चर्चा झाली नसली तरी आता ज्या पद्धतीने वृत्तपत्रांनी नोंद घेतली. त्यानंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूवर एकत्र येण्यासाठी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. सर्वांना मिळून करू. आमची भावना आहे की एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे, असे शरद पवार यांनी नमूद केले.