सहन होईना आणि सांगताही येईना’, जिल्ह्याच्या राजकारणाची अशीच काहीशी सद्यस्थिती! मोदी लाट काय येऊन गेली, अनेकांमध्ये प्रस्थापितांचा पराभव आपणच करू शकतो, असा विश्वास दाटून आलाय. परिणाम काय तर अनेक मतदारसंघात बंडाचे झेंडे! आघाडी काय किंवा महायुती काय परिस्थिती सारखीच! राजकीय पटलावरील ‘चेकमेट’ एवढा वधारलाय की काही नेते आणि पक्ष कमालीचे अस्वस्थ आहेत.नुकतीच आटोपलेली लोकसभा निवडणूक याचे ठसठशीत उदाहरण. दोन्ही खासदार अर्थातच महायुतीचे! बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसकडून तर मधुकर पिचड राष्ट्रवादीकडून राज्य मंत्रिमंडळात. असे असूनही ‘आघाडीचे जिल्ह्यावर वर्चस्व आहे’ अशी नोंद करणे आता धाडसाचे ठरेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर ‘दल-बदलू’ हवा एवढी वेगात आहे, की कोणत्या पक्षात कोण असेल, याचाच मेळ लागेना. सर्वाधिक झळ बसतेय ती राष्ट्रवादीला. अलीकडेच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते पक्ष सोडणार, हे जवळपास निश्चित मानले जाते. पण भाजपात जाणार की नाही, हा संभ्रम कायम आहे. काँग्रेसतर्फे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीतर्फे नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख, पाथर्डी-शेवगावमध्ये चंद्रशेखर घुले, शिवसेनेतर्फे अहमदनगर मतदारसंघात अनिल राठोड, पारनेरमध्ये विजय औटी, कोपरगावात अशोक काळे, भाजपातर्फे राहुरीतून शिवाजी कर्डिले या विद्यमान आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. श्रीगोंद्यात पाचपुते प्रकरणामुळे संभ्रम वाढला आहे तर अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीकडून स्वत: मधुकर पिचड लढणार की त्यांचे पुत्र वैभव यावरून अद्याप पडदा उघडलेला नाही. कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे आ. राम शिंदे यांच्या उमेदवारीला अनपेक्षितपणे पक्षांतर्गत विरोध समोर आला आहे. कोपरगावात राष्ट्रवादीतर्फे बिपीनदादा कोल्हे मैदानात असतील. तिकिटासाठी जिल्ह्यात सध्या महायुतीकडे रांगा आहेत.
चेकमेटच्या राजकारणात नेते अस्वस्थ !
By admin | Published: August 14, 2014 3:15 AM