मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वेवर टाउनशिप उभारतानाच त्या परिसरात कृषी प्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. विकासाच्या या महामार्गासंदर्भात फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानाहून पाच विभागीय आयुक्त आणि ११ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावी. शेतकरी आणि इतर जमीन मालकांना चांगले आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भातील निर्णय शासन लवकरच घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि विजय देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते. मोपलवार यांनी या महामार्गासंदर्भात सादरीकरण केले. या महामार्गावर २३ ठिकाणी टाउनशिप उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पाविषयी खात्री यावी आणि महामार्गासोबतच आजूबाजूच्या पायाभूत सुविधाही उभ्या राहाव्यात, यासाठी टाउनशिपचे नियोजन युद्धपातळीवर करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. टाउनशिपमध्ये वा त्याला जोडून कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्यावर, तसेच माल साठवणुकीची (कोल्ड स्टोअरेजसह) उभारण्यास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)
सुपर कम्युनिकेशन वेवर कृषी प्रक्रिया उद्योगांचे जाळे
By admin | Published: May 19, 2016 5:29 AM