ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - फडणवीस सरकारमागील वादांचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नसून राज्यातील कृषी खात्याने खरेदी केलेल्या सारा यंत्रात तब्बल १२५ कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताविषयी भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या नुसार गादी वाफे तयार करण्यासाठी वापरल्या जाणा-या सारा यंत्राच्या खरेदीत कृषी खात्याने कंत्राटातील नियमांचे भंग केले आहे. स्वस्तात सारा यंत्र देण्याची तयारी दर्शवणा-या कंत्राटदाराऐवजी त्या पेक्षा चढ्या दराने यंत्र विकणा-या कंत्राटदारालाच हे कंत्राट दिल्याचा दावा वृत्तात केला गेला आहे. खरेदी प्रक्रियेदरम्यान पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठातून यंत्रांची तपासणी होणे बंधनकारक असते. मात्र ही तपासणी हैदराबादमधील संस्थेकडून करवून घेण्यात आली. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने या यंत्रात काही बदल सुचवले होते मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याप्रकरणी अमरावतीतील भाजपा आमदार सुनील देशमुख यांनी स्वतःच या प्रकरणाची तक्रार केली आहे. सारा यंत्र नित्कृष्ट दर्जाचे असून यातून शेतक-यांचे नुकसानच होईल अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.