नवी दिल्ली - “वन नेशन, वन इलेक्शन” ही काळाची गरज आहे. निवडणुकांमध्ये गुंतून पडल्याने विकासाला खीळ बसते, त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीचा अपव्यय होतो. त्यामुळे देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाला एनडीएचा घटकपक्ष म्हणून शिवसेना कायम भक्कम पाठिंबा देईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली. आज दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली श्रीकांत शिंदे यादेखील उपस्थित होत्या, यावेळी पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत करून मिळालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने राज्यात केलेल्या कामाच्या बळावर राज्यातील जनतेने ऐतिहासिक जनादेश देऊन महायुतीला विजयी केले असल्याचे सांगितले. मात्र या विजयामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असून नव्या इनिंगमध्ये राज्याला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांना केली. त्यावर यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने त्याच जोमाने काम करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले. तसेच त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लवकरच मोदी यांच्या भेटीसाठी येऊ असेही शिंदे म्हणाले.