सुनील घरत,
वसई/पारोळ- या तालुक्यात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढत असून ती ३ लाखाहून अधिक आहे. या तालुक्यात १ हजार ९८७ लोकांच्या सुरक्षेसाठी १ पोलिस अशी दयनीय अवस्था आहे वसईत परप्रांतियांचे वाहते लोंढे, कोणत्याही ओळखीपाळखीशिवाय राहत असलेले गुन्हेगारीवृत्तीचे लोक, नालासोपारा पूर्वेकडील संतोषभुवन, धानिवबाग, पेल्हार, वाकणपाडा, नवजीवन, वसईफाटा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जात असून या भागात सहजपणे कायदा हातात घेतला जात आहे. वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींचे अपहरण, व्यापाऱ्याच्या हत्या, चैन स्रॅचिंग, चोरी, दरोडे, या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने वसई तालुक्यातील पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते/नगरसेवक धनंजय गावडे यांनी राज्योच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.वसई तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर, विरार या पोलिस ठाण्यातील बल वाढवण्यात यावे, रिक्त पदे तातडीने भरणे, अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या निवासाचीसोय करणे, पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, पोलिसांना आवश्यकतेनुसार अत्याधुनिकशस्त्रे, साधनसामुग्री, व वाहन पुरवणे, गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट करणे हया मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्याचे धनंजय गावडे यांनी लोकमतला सांगितले. वसई-विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, हा प्रस्ताव अनेक वर्षे पडून आहे. तसेच नव्याने वाढलेल्या परिसरासाठी सुचविलेली नवीन पोलीस ठाणीही लालफितीत आहे. या दोन गोष्टी झाल्या तरच पोलीस बळ वाढेल. अन्यथा, स्थिती जैसे थे राहिल.वसई तालुक्यात वसई, वालीव, विरार, माणिकपूर , अर्नाळा, नालासोपारा, बोळींज या पोलिस ठाण्यांचा समावेश असून या पोलिस ठाण्यामध्ये पोलिस बलही अपुरे आहे. तसेच दोन पोलिस ठाणी मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. वसईतील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसबल व साधनसामुग्री अपुरी पडत असल्याने वसईत गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांपुढे आव्हान उभे राहत आहे.