ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवर घाव घालण्याचे चौफेर प्रयत्न सुरु असल्याता आरोप करत कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी राज्य सरकारने दिलेले सर्व पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. पवार यांनी पुरस्कारात मिळालेले १ लाख १३ हजार रुपयेदेखील परत करणार असल्याचे म्हटले आहे.
दादरीतील घटनेनंतर सध्या देशभरातील २० हून अधिक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहे. यात आता मराठी साहित्यिकांचाही समावेश झाला आहे. कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी राज्य सरकारचे पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले आहे. सध्या देश अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून जात असून १९७५ पेक्षा सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहिच्य आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात अपिरिमित दंडेलशाही सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र, भारत जिथे आपण राहतो तेथील सर्वसामान्य माणसेही जीवमुठीत धरुन कसंबसं जगत आहेत. राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीविताची आणि त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी द्यावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.