मुंबई : जीवघेणा ठरणाऱ्या इबोला विषाणूमुळे संपूर्ण जगात घबराट पसरली आहे़ अद्याप या आजाराने भारतात शिरकाव केलेला नाही़ मात्र खबरदारी म्हणून पालिकेच्या आरोग्य खात्याने विमानतळावर तपासणी केंद्र सुरू केले आहे़ त्यानुसार विशेषत: आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांची कसून आरोग्य चाचणी केली जात आहे़ याबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत आज देण्यात आली़ नायजेरिया, गिनी, लायबेरिया, सिएरा लिओन या देशांमध्ये या विषाणूंचे थैमान सुरू आहे़ मात्र या रोगावर कोणतेही उपचार नसल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे़ त्यामुळे पालिकेने या देशांतून मुंबईत दाखल होणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे़संबंधित देशातून आलेले व या रोगाची किरकोळ लक्षणे असलेल्या नागरिकांना जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे़ या रोगाची लागण झालेल्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात येईल़ राज्य सरकारमार्फत जे़ जे़ रुग्णालयातही या रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले़ रोगाचा प्रादुर्भाव होत असलेल्या देशांतून आलेल्या नागरिकांमध्ये विमानतळावर तपासणीदरम्यान लक्षणे आढळून आली नाहीत, तरी पुढील २१ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल़किरकोळ लक्षणाचे रुग्ण जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये, तर लागण झाल्याची दाट शक्यता असलेल्या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)
इबोलासाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: August 13, 2014 3:15 AM