वादा पुरा करो : जनमंचचे २० ला प्रतिकात्मक आंदोलन नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनंती करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनरत ‘जनमंच लढा विदर्भाचा’ या संघटनेच्यावतीने येत्या २० आॅगस्ट रोजी ‘वादा पुरा करो’ या शिर्षकांतर्गत व्हेरायटी चौकात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ आॅगस्ट रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त जनमंचच्या धरमपेठ येथील कार्यालयात बुधवारी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर उपरोक्त आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. १९९७ मध्ये भुवनेश्वर येथील भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात आला होता. सत्तेत आल्यावर आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असा ठराव मंजूर झाला होता. भाजपाची सत्ता आता केंद्रात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २१ आॅगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना भुवनेश्वरमध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणे आणि ते पूर्ण करण्याची विनंती करण्यात येईल. हे आंदोलन पूर्णपणे प्रतिकात्मक राहणार आहे. यात कुठलेही शक्तिप्रदर्शन होणार नाही. भुवनेश्वरमध्ये पार पडलेल्या ठरावाचे प्रतीक तयार करण्यात येईल. ते व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभे करून ‘वादा पुरा करो’ अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात येईल. यात केवळ प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी होतील, असे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्यासह चंद्रकांत वानखडे, प्रा. शरद पाटील, सुरेश शिंदे, हरीष इथापे, प्रकाश इटणकर, चंद्रकांत खंडेलवाल, डॉ. सुरेश ब्राह्मणकर, अॅड. गोविंद भेंडारकर, अॅड. वसुसेन देशमुख, जुगल कोठारी, राम आखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भासाठी आता पंतप्रधानांना साकडे
By admin | Published: August 14, 2014 1:23 AM