लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (जि. बीड) : मुंबईहून बीडमार्गे लातूरकडे जाणारी खासगी बस उलटून झालेल्या अपघातात ९ ठार आणि २६ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी पहाटे ५च्या सुमारास आष्टी तालुक्यातील धानोरा घाटात घडली. मृतांमध्ये बीड, लातूर, मुंबई, पुणे जिल्ह्यांतील रहिवाशांचा समावेश आहे. बोरीवलीहून (मुंबई) लातूरला जाणाऱ्या ‘सागर’ या खासगी स्लीपर बसमध्ये ३० आसनक्षमता असतानाही ४० प्रवासी होते. सर्व प्रवासी साखरझोपेत असतानाच धानोरा घाटातील वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस १०० फूट खोल पलट्या खात गेली. या भीषण अपघातात ८ जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान अहमदनगर येथे मृत्यू झाला. अन्य २६ जखमी प्रवाशांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यापैकी २३ जखमींना सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बसचालक नरसिंग गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मृतांची नावेरशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (६०, रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई, जि. बीड), आतिक खान मुनवर (३२, रा. सोनीमोहा, ता. केज, जि. बीड), मेहरून्निसा आमिन पटेल (३५, रा. मुंबई), आसिमा नजीम सय्यद (४५, मुंबई), सर्जेराव लक्ष्मण पवार (३०, वाटीवाडा तांडा, ता. धारूर, जि. बीड), योगेश गौतम टकले (३०, चिखली, ता. आष्टी जि. बीड), पठाण बहादूर पठाण इस्माईल (६५, रा. बसवेश्वर, जि. लातूर), सुनील मल्हारी कुंभारकर (४५, रा. कर्वेनगर, पुणे), चाँद पाशा ताजोद्दीन पठाण (६६, रा. नेकनूर, ता. बीड).
बीडमध्ये खासगी बस उलटून नऊ ठार
By admin | Published: June 12, 2017 2:41 AM