नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाच्या निरोपासाठी जगभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मद्याच्या पार्ट्या करण्यात आल्या. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांत वाहतूक पोलिसांनी सूचना जारी केलेल्या होत्या. तरीही मुंबईत तब्बल १७८०० जणांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आले आहे.
यामध्ये दारु पिऊन वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, हेल्मेट न घालणे यासह इतर नियम मोडण्यात आले आहेत. पुण्याचा अद्याप आकडा यायचा असला तरी थर्टी फर्स्टच्या उन्मादात किती जणांनी नियम मोडले याची एकट्या मुंबईतील आकडेवारी खूप मोठी आहे.
वाहतुकीचे नियम मोडण्याचे चलनाचा आकडा खूप मोठा असला तरी हा दंड एकूण ८९ लाख रुपयांचा आहे. वाहतुकीस अडथळा आणणे 2,893 प्रकरणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवण्याची 1,923 प्रकरणे आणि वाहतूक सिग्नल मोडण्याच्या 1,731 घटनांची नोंद झाली आहे. सार्वजनिक वाहतूक वाहने चालवण्यास नकार दिल्याच्या 1,976 प्रकरणांचा या यादीत उल्लेख आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे 842 चलन जारी करण्यात आली आहेत. सीटबेल्ट न लावता वाहन चालवल्याने 432, मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल आणि वाहन चालवताना फोन वापरल्याने 109 चलन, ट्रिपल राइडिंग आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवल्यामुळे अनुक्रमे 123 आणि 40 चलन जारी करण्यात आली आहेत.