मुंबई : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याकडे पाहत मारण्याचा हावभाव केल्यामुळे विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. ‘आपण मंत्री आहात; जबाबदारीने वागा. यापुढे असे होता कामा नये, अशी समज अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी महाजन यांना दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर तोफ डागली. दमणगंगा-पिंजाळ प्रकल्प आणि तापी-नारपार या महाराष्ट्र-गुजरात आंतरराज्य नदीजोड प्रकल्पांद्वारे महाराष्ट्राचे ११० टीएमसी पाणी गुजरातला पळविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तेव्हा या बाबतचा सामंजस्य करार २०१० मध्ये आघाडी सरकारच्या काळातच झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भुजबळ बोलत असतानाच भाजपाचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हरकतीच्या मुद्यावर उभे राहिले आणि त्यांनी भुजबळ यांना लक्ष्य केले. तुमच्या सरकारच्या काळात करार होत असताना हा विचार आला नाही का? महाराष्ट्राचे पाणी पळविण्याची चिंता करता पण उत्तर महाराष्ट्रात मांजरापाड एक प्रकल्पाद्वारे येवला तालुक्याला तुम्हीच पाणी पळविले. अन्य भागाला पाणी पुरवू शकणारा मांजरापाड २ प्रकल्प हाती का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला. यावर, राष्ट्रवादीचे एरंडोलचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गुजरातशी केलेले करार नव्या सरकारने रद्द करावेत, उगाच आधीच्या सरकारवर खापर का फोडता, असे सुनावले. त्याचवेळी सभागृहात आलेले जलसंपदा मंत्री महाजन यांनी पाटील यांच्याकडे मूठ आवळून मारण्याची अॅक्शन केल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला. सत्तारुढ आणि विरोधकांमध्ये प्रकरण हमरीतुमरीवर येतेय असे वाटत असतानाच या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाजन यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. अध्यक्षांनी महाजन यांना त्यांच्या वर्तवणुकीबद्दल समज दिली. (विशेष प्रतिनिधी)
मंत्र्यांच्या हावभावावरून विधानसभेत रणकंदन
By admin | Published: March 12, 2015 1:37 AM