मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा नालेसफाईची पाहणी करणार नसल्याची घोषणा केली आहे. नालेसफाईच्या कामात १५० कोटींचा घोटाळा झाला असल्यामुळेच त्यांनी पाहणी दौरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही भूमिका म्हणजे नालेसफाईच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रकार असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. वर्षभरात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नालेसफाईचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पावसाळा १५ दिवसांवर आला असतानाही अद्याप नालेसफाईने वेग घेतला नसल्याचा आरोप करत, विरोधी बाकांवरील काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपाला लक्ष्य केले आहे, तर भाजपा नेते नालेसफाईवरून शिवसेनेवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. विरोधकांसह मित्रपक्ष भाजपानेही नालेसफाईवरून लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने, शिवसेनेने नालेसफाईची सारी जबाबदारी प्रशासनावर ढकलली आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी तर महापालिका आयुक्तांना पत्र लिहून नालेसफाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले. याबाबत निरुपम म्हणाले की, ‘पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त करायला हवे, पण पाहणीच करणार नसल्याचे सांगत, उद्धव ठाकरे आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहेत. पालिकेचा कारभार पाहता, या वर्षीही पाणी साचण्याची शक्यता आहे. पाणी साचल्याने मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाला शिवसेनाच जबाबदार असेल, असे निरुपम म्हणाले. शिवसेना-भाजपाला मुंबईकरांची कामे करायची नसतील, तर त्यांनी सत्ता सोडून द्यावी. २० वर्षे सत्तेत असणारी भाजपा केवळ शिवसेनेवर आरोप करून आपले हात झटकत आहे. भाजपा सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठवू पाहत असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
नालेसफाईबाबत सत्ताधाऱ्यांचा पळ
By admin | Published: May 19, 2016 5:02 AM