गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा काँग्रेसकडे उच्छुकांची संख्या कमालीची वाढली आहे. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारतला यामुळे धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी तब्बल १४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे आले आहेत. २०१९ मध्ये हीच संख्या 476 एवढी होती.
काँग्रेस मविआमध्ये असल्याने २८८ पैकी ९०-१०० जागाच लढवणार आहे. तरी देखील काँग्रेसकडे सर्व मतदारसंघातून लढण्यासाठी अर्ज आले आहेत. यात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक अर्ज आले आहेत.
२०१४ पासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेस दुबळी पडत चालली होती, त्यातच २०१९ मध्ये भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. यामुळे काँग्रेस संपली असे बोलले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसाच प्रचारही करत होते. परंतू, यंदाच्या लोकसभेला काँग्रेसने १०० चा आकडा गाठला आणि नाऊमेद झालेल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत ८० ते ९० जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तसेच हा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असेही सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागितले होते. या अर्जांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेला काँग्रेसने ४२ आणि ४४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ ला शरद पवारांमुळे काँग्रेसला या जागा टिकविता आल्या होत्या असेही सांगितले गेले होते. आता पाच वर्षांत ही परिस्थिती बदलली असून काँग्रेसच्या ९० जागा येतील असा अंदाज आहे. यामुळे मविआच्या बैठकीत काँग्रेसने 135 जागा लढविण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही सांगितले जात आहे.