कोपरगाव (अहमदनगर) : येथील महिला तहसीलदारांवर मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तहसीलदारांनी पोलिसांत हल्ल्याची तक्रार न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, तर घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर बुधवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी बसस्थानक परिसरातून ‘लोकमत’चे अंक पळविले. पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार इंदिरा चौधरी यांच्यासह गटविकास अधिकारी संदीप जठार यांनाही मारहाण झाल्याची चर्चा आहे. वाळू तस्करांनी हल्ला केल्याचा संशय होता. मात्र, हल्ला झाल्यानंतर तहसीलदार घराबाहेरच आल्या नाहीत. पोलिसांनी रात्री जमलेल्या लोकांना पांगविले होते. मारहाणीत तहसीलदारांना जबर मार लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ मात्र, बुधवारी चौधरी यांचा मोबाइल नॉट रिचेबल होता, तसेच त्यांच्या निवासस्थानाला कुलूप होते़ जठार हेही पंचायत समितीत आले नव्हते़ (प्रतिनिधी)>पहाटे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून, तसेच मोटारसायकलवर काही तरुण बसस्थानकावर आले. त्यांनी ‘लोकमत’च्या अंकाचे गठ्ठे चोरून नेले़ त्यामुळे लोकांना शहरात अंक मिळाला नाही़ कोपरगाव पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घरगुती मामला!जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी सकाळी तातडीने कर्मचाऱ्यांना चौधरी यांच्या निवासस्थानी पाठविले. मात्र, चौधरी यांनी हा घरगुती मामला असल्याचे सांगत तक्रार देण्यास नकार दिला.
तहसीलदारांवरील हल्ल्यावरून ‘संशयकल्लोळ’
By admin | Published: May 19, 2016 5:36 AM