"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:50 AM2024-08-30T10:50:34+5:302024-08-30T10:51:08+5:30

Tanaji Sawant Ajit Pawar: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावरून महायुतीत वादाची ठिणगी

Sharad Pawar NCP taunts Mahayuti said Tanaji Sawant spoke what CM Eknath Shinde thinks of Ajit Pawar | "तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

"तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले"; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

Tanaji Sawant Ajit Pawar, Mahayuti: राज्यात दोन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेसाठी महायुती एकत्रित लढणार असल्याची चर्चा आहे. पण काही नेतेमंडळींच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानाने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात," असे तानाजी सावंत म्हणाले. या विधानाला अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटातून प्रतिक्रिया आल्या आहेतच. पण महायुतीतील या शीतयुद्धावर शरद पवार गटानेही (Sharad Pawar NCP) टोला लगावला आहे.

वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भडकल्याचे दिसत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यावरुन शिंदे गटाला टोला लगावला. मिटकरी म्हणाले, 'महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असे म्हटले आहे'.

शरद पवार गट काय म्हणाला?

लोकसभा निवडणुकीतही भाजपाची पीछेहाट झाल्यावर याला जबाबदार अजित पवार असल्याचा सूर संघ आणि भाजपाने आळवला. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे. कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांचं आहे. अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित दादांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.

"शरद पवारांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी विकासाच्या साठी सत्तेमध्ये जात आहोत अशी घोषणा केली होती. त्याला दुजोरा प्रफुल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे व आदी नेत्यांनी दिला होता. आता अजित दादांच्या अस्तित्वावरच घाला मंत्री तानाजी सावंत यांनी घातल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील हे सर्व नेते गप्प का? विधानसभेत महायुतीकडून ८० ते ९० जागा मिळवू अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली होती. आता २५ जागा मिळतील की नाही याचीही शाश्वती अजित दादांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागतो," असा टोमणा तपासे यांनी मारला.

"शरदचंद्र पवारांच्या पक्षांमध्ये अजितदादा असताना त्यांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. त्याच अजितदादांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात हे अगदी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं तानाजी सावंत बोलून गेले की काय?" असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.

Web Title: Sharad Pawar NCP taunts Mahayuti said Tanaji Sawant spoke what CM Eknath Shinde thinks of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.