मुंबई: काल राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी त्यांच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. पवार आपल्या भाषणात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, असा आरोप ठाकरेंनी केला. त्या आरोपाला आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
'मी त्यांना फार गांभीर्याने घेत नाही'पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, "राज ठाकरे वर्षा-सहा महिन्यात एखादं स्टेटमेंट करतात. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते म्हणतात की, मी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. पण, दोन दिवसांपूर्वी मी अमरावतीमध्ये गेलो होतो. तुम्ही माझे अमरावीतचे भाषण ऐकू शकता. मी त्यात शिवाजी महाराजांचे योगदान, यावर पंचवीस मिनीटे बोललो."
'शाहु-फुले-आंबेडकरांचा अभिमान'पवार पुढे म्हणाले की, "ते म्हणातात की, मी माझ्या भाषणात फक्त शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेतो. पण, मला त्याचा अभिमान आहे. या राज्यात शिवछत्रपतींचे सविस्तर वृत्त काव्यांच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सर्वात आधी लिहीले. शाहू,फुले, आंबेडकर यांना महाराजांबद्दल खूप आस्था होती. महाराजांचा आदर्श घेऊन सत्तेचा वापर कसा करावा, याचा विचार तिन्ही पक्षांनी केला आणि त्यातूनच महाराजांच्या विचाराची मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे."
संबंधित बातमी- "बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास मांडला, त्याचा आजही विरोध"-शरद पवार