“दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:21 IST2024-12-10T17:18:22+5:302024-12-10T17:21:39+5:30
India Alliance Politics: संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर आता शरद पवारांचा पक्ष संपवण्यासाठी भेटत असतील. शरद पवारांच्या गटातील बरेच आमदार अजितदादांच्या गटात येण्यास तयार असून, लवकरच तसे दिसून येईल, असा दावा करण्यात आला आहे.

“दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक”; कुणाचा दावा?
India Alliance Politics: विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीने पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आणि ईव्हीएमविरोधात तीव्र निषेध नोंदवला. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. खुद्द शरद पवार यांनी या ठिकाणी जाऊन महायुतीवर टीका केली. शरद पवार यांच्या सभेनंतर भाजपाकडून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध जनजागृती केली जात आहे. भाजपा नेतेही या गावात जात आहेत. राज्यात एकीकडे ईव्हीएमचा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर मात्र इंडिया आघाडीत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अदानींच्या मुद्द्यावरून संसदेच्या सभागृहांमध्ये इंडिया आघाडीचे नेते एकजूट दाखवत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र इंडिया आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. नेतृत्व करण्यावरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांनी इंडियाचे नेतृत्व करण्याची तयारी दाखवली असून, लालू प्रसाद यादव यांनीही समर्थन दिले आहे. यावरून राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.
दिल्लीत शरद पवारांकडे EVMची नाही, तर राहुल गांधींचे नेतृत्व बदलण्यावर बैठक
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी बैठक ईव्हीएमबाबत होत नाही, तर राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलण्यासाठी आहे, राहुल गांधीवर अविश्वास दाखवण्यात येत आहे. राज्यात जे काही घडले, लोकसभेत जो काही पराभव झाला, यानंतर इंडिया आघाडीला एक नव्या नेतृत्वाची गरज आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाईल असे वाटत आहे. ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करून विरोधकांना काही मिळणार नाही. केवळ त्यांच्या वेळ जाणार आहे, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला. आता ते शरद पवार यांचा पक्ष संपवण्यासाठी कदाचित भेट घेतील. हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा संजय राऊत यांना कुठलाच नैतिक अधिकार नाही. जयंत पाटील हे महायुतीमध्ये येऊ शकतात, हे सहा महिन्यापूर्वीच जाणले होते. विधानसभा निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातले बरेचसे आमदार राष्ट्रवादी सोडून अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मर्ज होण्यासाठी इच्छुक असल्याचे सध्या दिसते आणि ते लवकरच होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही ते म्हणाले.