“पराभव असा का झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करावे, मग सल्ले द्यावे”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:00 IST2025-03-17T11:58:14+5:302025-03-17T12:00:23+5:30
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन काँग्रेसने शोधले पाहिजे, असा टोला लगावण्यात आला आहे.

“पराभव असा का झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करावे, मग सल्ले द्यावे”; कुणी केली टीका?
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जाती धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्ध्वस्त करू पाहत आहे. तळकोकणात सामाजिक सौहार्द बिघडवून येथील शांतता नष्ट करण्याचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महिनाभरात स्थानिक लोकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करा, प्रदेश काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असे प्रांताध्यक्ष सपकाळ म्हणाले. याला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
पराभव असा का झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करावे, मग सल्ले द्यावे
पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की, कुठल्याही जातीजाती-धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाली असेल तर ती मिटवणे त्यासाठीच मी पालकमंत्री आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची आताच नवीन नियुक्ती झाले आहेत. सरकारवर टीका करतो, हे दिल्लीला दाखवायला पाहिजे त्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. काँग्रेसने आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसने आपला पराभव असा का झाला? हे पाहिले पाहिजे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन शोधले पाहिजे. मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला पाहिजे, असा पलटवार उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, तेलाचे साठे जे सापडले आहेत ते अजून मोठ्या प्रमाणात सापडले नाहीत. तेल किती आहे हे सिद्ध होईल. याचा शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपण त्याच्यावर बोलू शकतो, असे उदय सामंत म्हणाले.