ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - शेतक-यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचे पाप शिवसेना कदापि करणार नाही. कायदा तुमचा असला तरी आमचा वायदा शेतकर्यांशी आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून भू-संपादन विधेयकविरोधी भूमिकेचे समर्थनच केले आहे.
लोकसभेत भू-संपादन विधेयक मंजूर होत असताना शिवसेनेचे खासदार मतदानात सहभागी न होता तटस्थ राहिले होते. या भूमिकेचे सामनातून समर्थन करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधातील कोणत्याही कायद्याचे समर्थन शिवसेना करणार नाही, हा आमचा शब्द होता व दिलेल्या शब्दास जागण्याची आमची परंपरा आहे. आमची बांधिलकी कष्टकर्यांशी आहे. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. शेतकरीविरोधी विधेयकाबाबत शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेऊन काय मिळवले? महाराष्ट्रात व दिल्लीत सरकारात सहभागी व्हायचे व सरकारी विधेयकांना विरोध करायचा हे कसे? पण शिवसेना ढोंग करीत नाही. शेतकर्यांकडे मते मागायची, त्यांना स्वप्ने दाखवायची, भरमसाट आश्वासने द्यायची व सत्ता येताच त्यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचा. शेतकरी कर्जबाजारी असल्याने तो आत्महत्या करतो, त्यामुळे त्याचा सातबारा कोरा करा ही आमची मागणी आहे, पण त्याच्या शेतजमिनी काढून घेऊन सातबारा कायमचा कोरा करा, असा त्याचा अर्थ नाही, असे लेखात म्हटले आहे. शिवसेना उद्योग आणि विकासाची शत्रू नाही, पण शेतक-यांच्या रक्तातून मूठभर उद्योगपतींचे विकास मळे फुलणार असतील तर ते आम्ही कसे मान्य करणार असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.
सत्तेसाठी माती खाण्याचे काम शिवसेनेने केले नाही. आम्ही जे केले ते केले एका प्रामाणिक भावनेने केले. शेतकर्यांचे शाप घेऊन आम्हाला एक दिवसही सुखाने झोप घेता येणार नाही , असेही लेखात म्हटले आहे.