सिल्लोडमध्ये सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व त्यानंतर नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सिल्लोड येथे भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्याच पद्धतीने खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थिती असेल, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते. याच दरम्यान आता सभेवरून ठाकरे गटाने सत्तारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सोमवारच्या सभेवरुन टीकास्त्र सोडलं आहे. सभेचा एक व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे. सभेला गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली असा खोचक टोलाही लगावला आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?" असा सवालही विचारला आहे.
"मैदान भरले नाही म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चालू भाषणात खुर्च्या उचलण्याची वेळ काल रात्री आली. लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? लोकांना भाषण आवडलं नसेल कदाचित..." असं म्हणत अंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सभेत भाषण सुरू असतानाच रिकाम्या खुर्च्या उचलण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"