मुंबई : श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी मुंबई व उपनगरात कोसळलेल्या श्रावणधारांनी मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. शहरापेक्षा पूर्व व पश्चिम उपनगरात श्रावणधारांचा मारा प्रभावी राहिल्याने सखोल भागात पाणी साचले. परिणामी, काही ठिकाणी वाहतुक कोंडी झाली होती.रविवारी सकाळी मात्र त्याने रौद्र स्वरूप धारण केले. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरावर जमा झालेल्या काळ्या ढगांनी पावसाचा जोरदार मारा सुरू केला. कुलाबा, भायखळा, गिरगाव, लालबाग आणि वरळी येथील पावसाच्या तुलनेत पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, पवई, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरीवली, गोरेगाव व मालाड परिसराला सकाळी सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत झोडपून काढले. दुपारी मात्र त्याने काहीसा विसावा घेतला. त्याचवेळी शहरातील पावसाने मुंबईकरांना चांगलीच उघडीप दिली. तर मेगाब्लॉक असतानाच पावसाने दमदार एन्ट्री केल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १० मिनिटांच्या विलंबाने धावत होती. (प्रतिनिधी)
श्रावणधारांचा मारा!
By admin | Published: July 28, 2014 4:11 AM