अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील महाबीज व इतर खासगी कंपन्यांचे पेरलेले सोयाबीन महागडे बियाणे उगवलेच नसल्याने कृषी अधिकारी, कंपन्यांच्या अधिकार्यांची धांदल उडाली असून, बियाणे तपासणी पथक कामाला लागले आहेत. शनिवारी ज्या सोयाबीन क्षेत्रावरील बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहेत, त्याचा तपासणी अहवाल मंगळवारी येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. यावर्षी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊ स झाल्यानंतर शेतकर्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. आजमितीस जिल्हय़ात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. १५ व २३ जुलै रोजी पडलेल्या दमदार पावसामुळे शेतकर्यांनी पेरणीचा वेग वाढवल्याने गुरुवारपर्यंत ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि पोषक ठरण्याऐवजी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही. गेल्यावर्षी अतवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले तर यावर्षी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात सर्वाधिक महाबीजच्या बियाण्यांचा समावेश असून, खासगी कंपन्यांचे बियाणे काही ठिकाणी उगवले नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. अकोला तालुक्यात कौलखेड जहाँगीर, रामगाव, खडकी, बोंदरखेड, चांचोडी आदी अनेक गावच्या शेतकर्यांचे सोयाबीन उगवले नाही. या संदर्भात शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत. गतवर्षी शेतकर्यांनी पीक विमा काढला असता आणि आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असताना विमा कंपनीकडून संबंधित शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत असताना यावर्षी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे.
सोयाबीन उलटले; तपासणी पथक लागले कामाला!
By admin | Published: July 28, 2014 1:25 AM